Tuesday, 3 May 2011

भूतदया

भूतदया

श्वेताला  लहानपणापासूनच प्राण्यांचे वेड. सातेक  वर्षांची असताना विस्फारल्या डोळ्यांनी तिने मनीमाऊला  घरच्या कोचावरच विताना पाहिले होते. आपल्या पोटाशी त्या पिल्लांना घेऊन मनी  पाजायची व  शेपटीने  गोंजारायची  तेव्हा ती पिल्ले मऊ मऊ लोकरीच्या गोळयान्सारखी दिसायची. आजी बरोबर देवळात जाताना ती हटकून गाईला चारा घालायचीच. शहरी वातावरणात सुद्धा तिला प्राणी आणि पक्षी निरखण्याची ,त्यांना खायला देण्याची खूपच ओढ.

जेवायला  बसली  तरी  पोळीच्या पहिल्या तुकड्याचा मानकरी हा कावळाच. त्यामुळे जेंव्हा ती सासरी गेली आणि दारातच बोलण्याऱ्या काकाकुव्याने  तिचे  स्वागत केले तेव्हा तिचे परकेपण क्षणात नाहीसे झाले. होता होता वर्षे गेली आणि घरात माणसांबरोबर कुत्री, मांजरी , मासे ही एकत्र नांदत  होते. तिचा मुलगा आशीष तर त्याही पुढचा. गल्लीतल्या सर्व कुत्र्यांचा तो म्होरक्याच. त्यांना खायला घाल, गोंजार, कुत्री व्याली तर तिच्यासाठी घरची चादर व दुधाचा रतीब. आई ओरडली तर आजी कडे मागायचे पण कसे तरी त्या कुत्र्यांना खायला घालायचेच. 'अरे बाबा ती कुत्री पाळीव नसतात, त्यामुळे त्यांना हात लाऊ नये' बाबा समजवायचे पण एक ना दोन . त्यामुळे जेव्हा स्वारी गल्लीतून चाले तेव्हा कॉलनीतली सगळी कुत्री स्वागताला हजार असायची. 'हा ब्रौनी, हा युकी, हा ब्लाकी' आशीष आपल्या आईला कौतुकाने त्या कुत्र्यांची ओळख करुन द्यायचा.

आज अमितचे बॉस जैनसाहेब घरी जेवायला येणार होते. आशिष ने बाबांना सहजच विचारले 'बाबा , मी जसा तुम्हाला बाबा म्हणतो, आई अहो म्हणते, आजी अरे अमित  म्हणते, तसे तुमचे बॉस तुम्हाला काय म्हणतात' 'अरे मला ते अमित अशीच हक मारतात' 'आणि तुम्ही त्यांना काय म्हणता? ' पुन्हा आशिष .'अरे मी त्यांना सर म्हणतो' इति अमित. अशा  काहीशा गप्पा होतायत तोवर दारावरची घंटी वाजली. जैनसाहेब नमस्कार करत आत आले. धर्माने जैन असल्यामुळे निरामिष  अन्न तर होतंच पण मिसेस जैन कांदा, लसुण पण खात नसल्याने अगदी ब्राह्मणी पद्धतीचा बेत   होता. जेवणे उरकत गप्पा रंगात येत होत्या. मध्येच  काकाकुवा काहीतरी गोड म्हणत होता 'वेलकम , हाऊ  आर यु ' वगैरे ऐकून  हळूहळू विषय पक्ष्यांवर आला. बोलता बोलता जैन म्हणाले की आमच्याकडे  गावा गावातून भूतदया पाळली जाते. मुन्ग्यांसाठी कणकेचे गोळे, सापांच्या बिळाशी फळे, कुत्र्यांना पाव बिस्कीट  अश्या  अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आवडता विषय म्हट्ल्यावर श्वेतालाही हुरूप आला.

'आम्हीही भूतदया पाळतो ' ती म्हणाली. 'ही कसली भूतदया? पक्ष्यांना पिंजऱ्यात   कोंडता  , कुत्र्याला बेल्टने  बांधून ठेवता.त्यांना मोकळे करा व मग भूतदयेच्या गोष्टी करा' जैन बोलून गेले. श्वेता तर अवाकच झाली. पण  कुठेतरी  तिला  त्यांचे  म्हणणे  पटले  सुद्धा . अशातच  एके  दिवशी  अचानक  तिने  PETA (people for ethical treatment of animals)ची   जाहिरात  वाचली .तिने  PETA चा  कोर्से केला आणि तिचे मन भरून गेले. घरी आल्या आल्या तिने काकाकुवाच्या पिंजऱ्याचे दर उघडले. पक्षी असला तरी तो बावचळला. मग सुरवातीला    बाल्कनीच्या   कट्ट्यावर तो उडून बसला. कधी पिंजऱ्यात येई तर कधी बाहेर जाई. शेवटी श्वेताने त्याला अक्षरश: हाकललेच .तरी तो काही जाइना. पण श्वेताचे सातत्य. त्यासमोर एक साधासा पक्षी तो काय करणार. बघता बघता एके दिवशी तो उडून गेला.

ते बघून दुसऱ्या दिवशी श्वेताने घरच्या मनीला व कुत्र्याला बाहेर सोडले . कुत्रा लगोलग खिडकीतूनच आत आला व आपल्या आवडत्या स्टुलावर  मक्ख्पणे बसून राहिला. मनी मात्र पसार झाली. ते पाहून श्वेताला थोदाबहुत का होईना पण आनंद झाला.  अमित आणि आजी बोलत होते 'तो जैन काहीही बोलतो आणि तू लगेच मनावर घेतेस. अगं ज्याचे त्याचे विचार असतात.' आशिषलाही   आपल्या आईचा राग आला होता पण शाळा, खेळ आणि टी.व्ही .यात  तो ते सगळं विसरून जात होता.

अशातच दोन दिवसातच एका माणसाचा फोने आला. 'अहो देशपांड्यांचे घर का?'
'हो' इति अमित
'अहो तुमचा काकाकुवा आमच्या अंगणात आला आहे.'
'अरेच्या तुम्हाला कसं माहित?'  'अहो तो सरखा इंग्रजीत बोलतो आहे.' फोनवरचा माणूस म्हणाला.
'Hello this is Deshpande's residence and you have dialed XXXX XXXX. I can't attend your phone right now but if you leave a message at the tone, I will call you back'.

आता  अमितच्या  डोक्यात  लक्ख  प्रकाश  पडला.  काकाकुवाचा पिंजरा त्यांच्या फोनशेजारीच असल्यामुळे त्याने अंसेरिंग मशीनचा मेसेजही पाठ केला होता.
'अहो त्याला कसंही करून घेऊन जा. दिवसरात्र हेच बोलून तो आमची झोप उडवतो आहे.' फोनवरचा माणूस. अमितला हसू आवरेना . लागलीच काकाकुवाची सोय परत पिंजऱ्यात करण्यात आली.

हे नाही होत तोवर मनी अचानक घरी आली. येताना तिने एका सश्याच्या पिल्लाला तोंडात धरून आणले होते. जणू काही श्वेतासाठी तिने भेटच  आणली होती. घरात तर हे दृश्य पाहून सगळेच हसत होते. श्वेताने घाई घाईने ते जखमी पिल्लू (मनीने तिचे दात चांगलेच खुपसले होते) एका खोक्यात घातले व गाडी काढली. थोडे दूर जाते नाही तोवर तिच्याच गाडीखाली  एक खार आली व दगावता दगावता वाचली. ती खार श्वेताला  जखमी अवस्थेत विव्ह्ल्ताना दिसली. तिने गाडी थांबवली व लागलीच खारीलाही त्या खोक्यात घातले. जवळच असलेल्या वन उद्यानात ती गेली व तिने  सशाचे पिल्लू व खार असलेला खोका  वन अधिकार्यांना सुपूर्द केला. आपल्या जाणीवेचा तिला कोण अभिमान वाटला. वन अधिकारी म्हणाले ,'अहो आम्ही जखमी प्राण्यांचे काहीही करू शकत नाही.' आमच्याकडे तशा काहीच सोयी नाहीयेत.' श्वेता हिरमुसली झाली. तेवढ्यात ते म्हणाले , ' पण  बरे झाले . आम्ही निदान घुबडाला तरी हे खाद्य देऊ शकतो.'

आता  तर श्वेतावर  कपाळाला  हात मारण्याची पाळी आली. तिने लागलीच खोका परत घेतला व प्राण्यांच्या डॉक्टरांकडे मोर्चा वळविला. शेवटी काहीही झाले तरी काही  प्राण्यांना माणसे ही हवीच असतात.
भूतदया म्हणून मोकळं सोडणे हा उलट त्यांच्यावर अन्याय आहे. नाही का ?

अनघा हुन्नुरकर
३०/४/२०११

No comments:

Post a Comment

Value your comments.Helps to hone my skills

thanks

anagha