आईचा विचार आला कि डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो फोटो ज्यात आई, बाबा आणि मी, असे आहोत. आईच्या त्या लांबसडक दोन वेण्या, चेहऱ्यावरील बुजरेपणा - एक पूर्ण व अश्राप चित्र. मी तेव्हा फक्त एकच वर्षाची होते पण तो फोटो अजूनही डोळ्यासमोर ताजा उभा रहातो.
आई विषयी लिहायचे म्हणजे कुठून सुरू करायचे?
पहिल्या श्वासाची साक्षी असते ती माउली. मागे वळून पाहताना अंत:चक्षु समोरून अशी काही चित्रे झरझर जातात कि आठवणींच्या त्या जाळ्यात काय उचलू नि काय नको - नुसती त्रेधातिर्पित , क्षणात हसू, क्षणात अनावर अश्रू .
आमची आई लौकिक दृष्ट्या लेखिका व संपादिका होती पण अनेकांना माहीतही नसेल कि ती उत्तम चित्रे रेखाटायची. शिवणकाम , भरतकाम, स्वयंपाक काहीही असो - तिला विलक्षण आवड. त्याकाळी ती इतके सुंदर फ्रॉक्स शिवायची कि मला टेलर पेक्षा तिच्या हातचेच कपडे आवडायचे. थोडे शिवून झाले कि ती अंगाला लाऊन अंदाज घ्यायची आणि तेव्हा जर मला काही नवीन fashion सुचली तर लगेच ती बदल करायची व असे कपडे घालताना मला खूपच आनंद व्हायचा. पुन्हा भरपूर कपडे घालायला मिळायचे ते वेगळेच. प्रत्येक वेळेला नवीन fashion आणि भरपूर फ्रॉक्स. World of bliss! माझ्या लेकीच्या बारशाच्या वेळी सुद्धा केवढा मोठा बाळंत विडा -दुपटी, झबली, टोपरी, स्वेटर, मोजे - अगदी भरपूर रेलचेल.
तीन वाढत्या मुलींच्या आवडी निवडी सांभाळून वर आमचा अभ्यास घ्यायचा , संस्कारांची शिदोरी बांधायची व याउपर लेखन आणि दिवाळी अंकाचे संपादन करायचे. ते सुद्धा कुठलाही पूर्वानुभव वा प्रशिक्षण नसताना. 'बागेश्री' हा दिवाळी अंक दर्जेदार मानला जाई.
मला वाटतं माझ्या आईकडे जादू होती. ती जे काही करायची ते उत्तमच असायचं.मग तो दही वडा असो, पुरणपोळी असो कि portrait असो. सगळं कसं परिपूर्ण. हळदी कुंकू, डोहाळ जेवण, केळवण - काहीही असो सगळी तयारी उत्साहात.
माझी आई लेखिका कशी झाली ही कहाणी मनोरंजक तर आहेच पण त्यापेक्षा माणसाला जिद्द असेल तर काहीही असाध्य नाही - या वाक्याचे सार आहे. जेव्हा आई matric झाली तेव्हा आजोबा रिटायर झाले होते. तो काळ असा होता कि परिस्थिती नसेल तर मुलींना फार शिकवत नसत. पेन्शनीत गेल्यावर तर अजूनच बिकट अवस्था. परीक्षेचा निकाल लागला तेव्हा माझी आई बेलापूरला मावशीच्या बाळंतपणाला गेली होती. परत येईस्तोवर कॉलेजेस सुरु झाली होती. माझ्या आईचा शाळेत दुसरा नंबर आला होता पण उशीर झाला होता. त्यात आजोबांनी परिस्थिती नसल्याचे सांगितले. त्याकाळी फ्रीशिप घेतली तर कमीपणा मानला जाई. आता काय करणार? पण ती मंदाकिनी होती. तिने drawing teacher चा कोर्स केला व नोकरी करून बी. ए. साठी प्रवेश मिळवला. बी. ए. च्या शेवटच्या वर्षात असतानाच गोगटे घराण्यात लग्न ठरले व लग्नानंतर जेमतेम साडे नऊ महिन्यात मी झाले. तरीही आईने बी. ए. ची परीक्षा दिली व अव्वल दर्जात पास झाली.
गोगटे घराणे मोठे. त्यामुळे नोकरी करण्याचा प्रश्नच नाही. आता काय करणार? पण मी म्हटले ना की ती मंदाकिनी गोगटे होती. हार मानणार? छट ! मग घरच्याघरी पुस्तकं वाचणे , मासिके वाचणे सुरु झाले. ( तेव्हा टी.व्ही. नव्हता बरं का ) वाचन करता करता तिला वाटले आपणही लिहावे. माझ्या बाबांना (कै. क. ना. गोगटे ) साहित्याची फारशी जाण नसली तरी आईला त्यांनी प्रोत्साहन दिले. काही कथा लिहिल्या त्या साभार परत आल्या. पण प्रयत्नांना यश हे असतेच. एके दिवशी गोड बातमी आलीच. दिनकर साक्रीकर कथा स्पर्धेत तिला दुसरे बक्षीस मिळाले. तिथूनच आईची भरारी म्हणा, यात्रा म्हणा वा घोडदौड म्हणा -सुरु झाली. तेव्हापासून अव्याहत लिखाण- लहान मुलांच्या कथा, कविता, वैज्ञानिक कथा, कादंबरी, लघु लेखन, समीक्षा, विनोदी- मिस्कील कथा, प्रवास वर्णन, 'सवत माझी लाडकी' या चित्रपटाची कथा, 'गागी' ही भावस्पर्शी लघु कादंबरी - ओघ चालूच. वाचन आणि लेखनाचा ध्यासच. जरा मोकळा वेळ मिळाला कि लागली लिहायला नाहीतर वाचायला.तिच्या डायरीतल्या टीपा ही इतक्या रंजक आहेत कि अनेक आठवणीना उजाळा मिळतो.
अशी आमची आई - जिद्द , चिकाटीचे धडे असे आम्हाला मिळाले. निराश होऊन आईकडे जावे व मरगळ , नैराश्य झटकून - नवी उमेद , नवा आनंद घेऊन कामाला लागावे.एक वेळ आम्ही घाबरू पण आई धीट. आपण सगळे पुनर्जन्म मानतो. शेवटी शेवटी जेव्हा आई खूप आजारी होती तेव्हा मी आईला विचारले 'आई , पुढच्या जन्मी तू कोण होणार ?' ती म्हणाली 'लेखिकाच पण आता इंग्रजीची'
आता जेव्हा मी तिच्या जीवन पटलाचा विचार करते , तिची झुंज अनुभवते तेव्हा राहून राहून हेच वाटते कि तिच्यात राणी लक्ष्मीबाई सारख्या लढवय्या स्त्रीचा अंश होता. फरक इतकाच कि क्षेत्र वेगळं होतं.
'खूब लड़ी मर्दानी वो तो झंसिवाली रानी थी '
सौ अनघा हुन्नुरकर
(रेखा गोगटे)
written on 5th Sep 2010